Type Here to Get Search Results !

आई राधा उदे उदे येडुसरीचा उदे उदे च्या जयघोषाने येरमाळा नगरी दुमदुमली (पंधरा लाखांच्या वर भाविकांनी चुना वेचला)

आई राधा उदे उदे येडुसरीचा उदे उदे च्या जयघोषाने येरमाळा नगरी दुमदुमली (पंधरा लाखांच्या वर भाविकांनी चुना वेचला)




अभय वार्ता / येरमाळा

सुधीर लोमटे

 येरमाळा ता.३ - येथील आई येडेश्वरी देवीच्या चैत्र पोर्णिमा यात्रा राज्यातील मोठया प्रमाणात भरणारी यात्रा म्हणून यशस्वी यात्रा ठरली आहे. यंदा श्री येडेश्वरी देवीची यात्रा अतिशय मोठ्या प्रमाणात भरली असुन देवीच्या यात्रेचा चुना वेचण्याचा मुख्य कार्यक्रम आज शुक्रवारी (ता. ०३) रोजी मोठया उत्साहात पार पडला. या कार्यक्रमासाठी राज्यासह बाहेर राज्यातील पंधरा लाखांच्या वर भाविक येरमाळा नगरीत दाखल झाले होते. येडेश्वरी देवीची पालखी मंदिरावरुन चुन्याच्या रानात येताच लाखों भाविकांनी चुनखडीचे खडे वेचुन पालखीवर टाकत आई राधा उदे उदेचा एकच जय घोष केला भाविकांच्या या गजराने चुन्याच्या रानाचा परिसर दुमदुमून गेला होता.


काल सकाळी ८ वा.येडेश्वरी देवीची पालखी डोंगरावरील मंदिरातुन पाच दिवस चालणाऱ्या यात्रेसाठी आमराई मंदिराकडे हालगी,जहांज,संबळाच्या गजरात वाजत गाजत निघाली. मुख्य चुन्याच्या रानात पालखी ११ वा. येताच भाविकांनी आई राधा उदे उदे,येडुसरीचा उदे उदेच्या जयघोष करताच चुन्याच्या रानाचा परिसर भाविकांच्या गजराने दणाणून निघाला.श्री येडेश्वरी देवीच्या मंदिराला यात्रे नंतर पालखी डोंगरावरील मुख्य मंदिरात परत गेल्या नंतर चुन्याने रंगावण्याची पूर्वापार परंपरा चालत आली आहे.त्यामुळे चुना वेचण्याचा कार्यक्रम यात्रेचा मुख्य कार्यक्रम मानला जातो चुना वेचण्यासाठी यात्रेला येण्याची परंपरा भाविकांच्या पिढ्यान पिढ्या चालत आलेली प्रथा असल्याने मजूर,शेतमजूर,बिगारी,चाकरमाने कर्मचारी,लहान मोठे व्यावसायिक, व्यापारी,भाविक राज्यभरातून न चुकता दरवर्षी चुना वेचण्यासाठी दाखल होतात.काळानुरुप या यात्रेला येणाऱ्या भाविकांची संख्या प्रतिवर्षी वाढतच गेल्याने आता ती लाखोंच्या संख्येवर पोहचली आणि श्री येडेश्वरी देवीची यात्रेला राज्यातील दुसऱ्या क्रमांकाची मोठी यात्रा असा मान प्रशासन स्तरावर आल्याने यात्रा पार पाडण्याची जबाबदारी जिल्हा प्रशासनावर आली आहे.


श्री येडेश्वरी देवीच्या चुना वेचण्याच्या कार्यक्रमाला वेगळे महत्व असुन यात्रेत या दिवशी येणाऱ्या पालखीवर चुन्याच्या रानात पालखी येताच चुन्याचे पाच खडे वेचून पालखीवर टाकण्यासाठी लाखों भाविकांची झुंबड उडते त्यामुळे भाविकांची आपले चुन्याचे खडे पालखीवर पडावे यासाठी स्पर्धाच लागली आहे की काय असे चित्र दिसत होते.यात्रेत भाविकांनी वेचलेला चुना गोवऱ्याची भट्टी लावुन भाजला जातो यात्रेनंतर पालखी मुख्य मंदिरात पोहचल्याच्या दुसऱ्या दिवशी देवीचे मंदिर चुन्याने रंगवले जाते त्यामुळे यात्रेत चुना वेचण्याचा प्रथा रुढ झाल्याचे जाणकारांचे मत आहे.ही परंपरा पिढ्यान पिढ्या चालत आली असुन चुन्याच्या रानात पालखी येताच चुनखडीचे कडे आपोआप रानात येतात असे लोक सांगतात पूर्वीच्या तुलनेत चुन्याच्या रानात लोकवस्ती वाढली असली तरी दरवर्षी भाविकांच्या हाती चुनखडी कशी येते ती पिढ्यानपिढ्या चालत आलेली आज पर्यंत ही प्रक्रिया लुप्त का झाली नाही चुन्याचे खडे आपोआप वर येतात यावर देवी येडेश्वरी जागृत देवी असण्याचा भाविकांना विश्वास येतो. त्यामुळेच भाविकांची तोबा गर्दी होते.यात्रेचे स्वरुपही यामुळेच वाढले आहे.


११ वाजता चुन्याच्या रानातून देवीची पालखी निघुन १२. ३० a वा. आमराई मंदिरातील पालखी मंदिरात पोहचली येथेही पालखी दर्शनासाठी भाविकांनी दिवसभर गर्दी केली होती.


श्री. येडेश्वरी देवीच्या यात्रेसाठी पोलीस प्रशासनाने विविध उपाय योजना आखून तगडा बंदोबस्त केला होता.आज पालखी मुख्यमंदिरातुन पोलिस प्रशासनाच्या कमांडो,दंगल नियंत्रण पथक,देवस्थान सयंसेवक,स्थानिक ग्रामसुरक्षा दलाच्या संरक्षण कड्यात निघाल्याने सुरक्षित पणे पालखी मिरवत आली.यावेळी ग्रामपंचायतचे पदाधिकारी,देवस्थानचे पुजारी,मानकरी,पालखी सोबत होते.


भाविकांना पिण्याच्या पाण्यासाठी ठीक ठिकाणी पाण्याच्या टँकरची व्यवस्था करण्यात आली होती.भारतीय स्टेट बँकेच्या वतीने थंड आरओ पाण्याच्या पानपोईची व्यवस्था करण्यात आली होती.


आंघोळीच्या पाण्याची मोफत सोय - येरमाळा येथील नितीन कवडे व परिवाराकडून दरवर्षी प्रमाणे याही वर्षी येडेश्वरीच्या भक्तांना त्यांच्या शेतातील बोअरवेल द्वारे रस्त्यालगत मोफत आंघोळीसाठी पाण्याची सोय केली गेली. 


देवीच्या पालखीचे आज चैत्र पोर्णिमा यात्रेनिमित्त आमराई मंदिराकडे आगमन होणार असल्याने स्थानिक भविकात मोठा उत्साह होता. पालखीच्या स्वागतासाठी गावातील महिला भाविकांनी बाजारचौक,वाणीगल्ली,रोकडेश्वर मारुती मंदिर चौक,छत्रपती मार्केट,संभाजी नगर रस्त्यावर मोठं मोठया रांगोळी,फुलांच्या रांगोळीची सजावट केली होती.


बुधवारी पहिल्या पोर्णिमेपासूनच भाविक लाखोंच्या संख्येने येरमाळ्यात दाखल होत होते.भाविकांची विक्रमी संख्या दाखल झाल्याने प्रत्येकाच्या हाती असलेले प्रत्येक कंपनीचे स्मार्ट फोन कव्हरेज मिळतं नसल्याने शोभेची वस्तु ठरले.यामुळे २ तारखेचा दुपार पासून ३ तारखेपर्यंत ७ वाजेपर्यंत ऑनलाइन खरेदी,विक्री व्यवहार सर्व्हर डाऊन असल्याने बंद राहिले. प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींचीही वृत्तसंकलन करताना मोठी अडचणी येत होत्या यात्रा परिसर सोडून दहा किमी बाहेर गेल्यावर वृत्तकामी सर्व्हर उपलब्ध झाले.



.....यंदाची यात्रा म्हणजे भाविकांच्या जमलेल्या अलोट गर्दीने आज पर्यंतचे विक्रम मोडीत काढणारी यात्रा ठरली. चुना वेचण्याच्या कार्यक्रमानंतर परत फिरलेल्या भाविकांच्या वाहनांमुळे राष्ट्रीय महामार्ग सोलापूर ते बीड पर्यंत वाहतूक कोंडी झाल्याने विस्कळीत सेवा झाली होती . ही वाहतुक कोंडी सोडवण्यात पोलीस प्रशासन अक्षरशः अपयशी ठरल्यामुळे आ .राणा पाटील , आ . कैलास पाटील हे जवळ जवळ चार तास ट्रॅफीक मध्ये अडकले होते .रात्री उशीरापर्यंत वाहतुक व्यवस्था सुरळीत करण्यात येरमाळा पोलीसांची दमछाक झाली .



अजित पिंगळे यांच्याकडून मोफत जेवण -

आई येडेश्वरी च्या यात्रेसाठी बाहेरगावा वरून आलेल्या भाविकांची जेवणाची सोय व्हावी म्हणून शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष अजित पिंगळे यांनी चार ठिकाणी मोफत जेवणाची व्यवस्था केली होती. त्या ठिकाणी हजारो लोकांनी जेवणाचा आस्वाद घेतला.



हेलीकॉप्टरने पालखीवर पुष्पवृष्टी

आ. राणाजगजितसिंह पाटील यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही पालखी चुन्याच्या रानात आल्यानंतर हेलीकॉप्टरने पुष्पवृष्टी करण्यात आली. लाखो भाविकांनी हा सुखद क्षण अनुभवला. त्यावेळी सर्व भाविकांमध्ये भावनिक वातावरण निर्माण झाले होते.

======================================










Post a Comment

0 Comments